Saturday, February 29, 2020

कु.अंजली गुट्टे उखळी (बु) ही परभणी जिल्ह्यातुन राज्य स्तरिय "गो गर्ल गो" स्पर्धेत पात्र ; सर्व स्तरातुन अभिनंदन !

कु.अंजली गुट्टे उखळी (बु) ही परभणी जिल्ह्यातुन राज्य स्तरिय "गो गर्ल गो" स्पर्धेत पात्र ; सर्व स्तरातुन अभिनंदन !


सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी जिल्हास्तरीय 28 फेब्रुवारी 2020 शुक्रवार रोजी संपन्न झालेल्या "गो गर्ल गो" १०० मीटर धाव स्पर्धेत श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळी ( बु ) ता.सोनपेठ येथील इयत्ता १० वी वर्गात शिक्षण घेत असलेली कु.अंजली अर्जुन गुट्टे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला व राज्य स्तरिय स्पर्धेत पात्र ठरली त्या बद्दल परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज,जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, जि.प.सदस्य,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृ.उ.बा.स.सोनपेठ राजेश दादा विटेकर, सोनपेठ पंचायत समिती सभापती मीराताई जाधव, प.स.सदस्य, तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार, गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षन आधिकारी शौकत पठाण,सरपंच उखळी (बु), चेअरमन उखळी (बु), संस्था अध्यक्ष तसेच सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक आदुडे सर व क्रीडा शिक्षक मोदी सर , कांबळे सर, काहेत सर, सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी, सोनपेठ तालुका क्रिडा संयोजक, श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळी (बु) सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्ग, मित्र परिवार आदिंच्या वतिने अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी मनस्वी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

सोनपेठ पंचक्रोशितील घडामोडी क्षनात आपल्या हाती,सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी मो.9823547752. 

Friday, February 28, 2020

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत विज्ञान दिना निमित्त प्रदर्शनाचे माणिकअप्पा निलंगे यांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत विज्ञान दिना निमित्त प्रदर्शनाचे माणिकअप्पा निलंगे यांच्या हस्ते उदघाटन



सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षिका यांच्या मार्गदर्शनात भव्य असे विविध विज्ञानाच्या प्रयोगांची प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य माणिकआप्पा निलंगे सर, माजी केंद्रप्रमुख विजयकुमार पोकळे सर, प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, सदस्य बाबासाहेब कसबे व मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम रिबीन कापून उद्घाटन संपन्न झाले. ततनंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे स्वागत सर्व शिक्षक, शिक्षिका व विज्ञान समितीच्या विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन केले. प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य माणिकअप्पा निलंगे व केंद्रप्रमुख विजयकुमार पोकळे यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा व्यक्त करून सर्व शिक्षक व शिक्षकांचे अभिनंदन करून सर्वांचे कौतुक केले. यावेळी विविध घोषवाक्याचे सर्व मान्यवर व शिक्षक आणि शिक्षिका यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अप्रतिम असे सूत्रसंचालन श्रीमती म्हात्रे.टि.बी. यांनी तर आभार श्रीमती डोंगरे आर.बी.यांनी केले तर या कार्यक्रमासाठी राठोड बी.आर., राऊत आर.आर., राठोड के.बी., पांचाळ के.व्हि.,गोरे ए.पी., श्रीमती जोशी एस.यु., श्रीमती बारगजे एन.एन., श्रीमती गायकवाड एस.ए., श्रीमती भराडे एस.टि., श्रीमती माळी डि.डि.व तिरमले पी.बी आदींनी परिश्रम घेतले.

व्हिजन पब्लीक स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहाने साजरा

व्हिजन पब्लीक स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहाने साजरा


सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये भारतीय शास्त्रज्ञ डाॅ.सी.व्ही.रमण यांच्या सन्मनार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे सर होते.व्यासपीठावर उपप्राचार्य भगवान घाटुळ सर उपस्थित होते.
        कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.डाॅ.सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या गीतमंचाने सौ.स्वाती गित्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानाचे गाणे हे विज्ञानगीत सादर केले. सदर कार्यक्रम ( इयत्ता ७,८,९ वी ) च्या वर्गाने विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. सुरज किशोर सर यांनी विज्ञान दिनाचे महत्व स्पष्ट केले.
      अध्यक्षीय भाषणात दुकळे सर म्हणाले डाॅ.सी.व्ही.रमण यांनी आण्विक विकीरण हा शोध लावला त्यामुळे २८ फेब्रुवारी ला त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत.आधुनिक तंत्रज्ञानाने पुढे असलेल्या शतकात आहोत.विज्ञानदृष्ट्या विकसीत अशा देशात आपण राहतो.आंधळेपणाने एखादी गोष्ट स्विकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. आपण देवांवर श्रध्दा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेऊ नये.आज ब-यापैकी लोक हे सुशिक्षित आहेत तरीही काही लोक हे अंधश्रद्धेच्या बाबतीत असुशिक्षीत आहेत.अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.(७ वी व ८ वी) च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग दाखऊन विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रद्धा नाहीसी केली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषा पनुरे, हिने केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद निर्मळ सरांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विज्ञान शिक्षक सौ.गित्ते मॅडम,सुरज किशोर सर, प्रल्हाद निर्मळ सर,आनंद जाधव सर, पाटील सर, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताची जनगणना 2021 साठीच्या प्रशिक्षण सत्राचे - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांच्या हस्ते उदघाटन

भारताची जनगणना 2021 साठीच्या प्रशिक्षण सत्राचे - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांच्या हस्ते उदघाटन                        
     
   
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

भारताची जनगणना 2021 साठी सर्व चार्ज अधिकारी व सेन्सेस क्लार्क (जनगणना लिपीक/अव्वल कारकुन) यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या दि.28 व 29 फेब्रुवारी 2020 रोजीच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.  यावेळी उपसंचालक डी.बी. गोंदे, मारुती सुलेभावी, व्ही.जे.परब, एस.एस. पराते, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी जनगणना विषयक सर्व माहितीचे संकलन हे मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याचे सांगितले तसेच माहिती संकलन पध्दती, मोबाईल ॲप, पत्रकावर माहिती भरणे, घरोघरी भेटी देवून सौजन्याने माहिती संकलीत करावी असे आवाहनही केले.  प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले तर उपसंचालक डी.बी.गोंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, नायब तहसिलदार यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 -*-*-*-*-

Thursday, February 27, 2020

चौथे अ.भा.वीरशैव मराठी साहित्य संमेलन, वाराणसी - अध्यक्षीय भाषण शांतितीर्थ स्वामी

चौथे अ.भा.वीरशैव मराठी साहित्य संमेलन, वाराणसी - अध्यक्षीय भाषण शांतितीर्थ स्वामी


सोनपेठ (दर्शन) :- 
परमपूज्य पदवाक्यप्रमाणपारावारपारद्रष्टे पूजनीय काशीज्ञानसिंहासनाधीश जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व आनंदवननिवासी ज्योतिर्मयस्वरूप भगवान विश्‍वनाथाचे चरणी नतमस्तक होतो. तसेच ज्ञानसिंहासनाचे आद्य आचार्य जगद्गुरू विश्‍वाराध्यांपासून अविरत चालत आलेल्या परंपरेस कोटी कोटी प्रणिपात. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वेदान्ताचार्य गुरू सिद्धलिंग शिवाचार्य व उद्घाटक मा. शिवराज पाटील चाकूरकरसाहेब आणि वीरशैव साहित्यप्रेमी बंधु-भगिनींनो...

परमपूज्य काशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र व दिव्य सान्निध्यात वीरशैव गुरुकुल शताब्दिवर्षात, आज भारतातील या प्राचीन व पवित्र शहरात, वीरशैवांचा हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणार्‍या ‘जंगमवाडी’ मठात चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे आपल्या सर्वांच्या साक्षीने भव्य, दिव्य स्वरूपात उद्घाटन झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आणि संमेलनाध्यक्षपदाचाही बहुमान आपण दिला, त्याबद्दल मी धन्य झालो आहे. हा बहुमान माझ्यासारख्या एका साध्या अभ्यासक-संशोधकाला दिला, त्यासाठी मी आपला सर्वांचा शतश: ऋणी आहे.

यापूर्वीची तीन संमेलने अनुक्रमे लातूर, साखरखेर्डा व धारेश्‍वर या ठिकाणी प्रा. डॉ. शे. दे. पसारकर, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर व प्रा. डॉ. भी. शि. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात संपन्न झाली आहेत. येथे होत असलेले हे संमेलन महाराष्ट्राबाहेर वाराणसी या पुण्यपावन नगरीत, वीरशैवांच्या अस्मितेचा मानदंड असलेल्या ‘जंगमवाडी’ मठात होत आहे. खर्‍या अर्थाने या संमेलनाने अखिल भारतीय स्वरूप धारण केले आहे. अशा या पवित्र ठिकाणी भरणार्‍या संमेलनाचे अध्यक्षपद देऊन परमपूज्य श्रीकाशीजगद्गुरू                 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींना व संमेलन आयोजन समितीला मी मनापासून धन्यवाद देतो. हा बहुमान स्वीकारताना मी माझ्या आई-वडिलांचे, शांतलिंग स्वामी शिखरशिंगणापूरकरापासून ते शतायुषी   डॉ. शिवलिंग शिवाचार्यांपर्यंत, पारलिंग प्रभुअय्या-बामणगावकरांपासून ते डॉ. चंद्रशेखर कपाळेपर्यंत, धर्मवीर देशिकेंद्र महाराजापासून ते मोगलेवारांपर्यंत व डॉ. राम तोंडारेपासून ते डॉ. शे. दे. पसारकरापर्यंतच्या सर्व शिवाचार्य, अभ्यासक, संशोधक, संपादक, प्रकाशक यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. तसेच अगदी परवापर्यंत आपल्यात असलेले व नुकतेच शिवैक्य पावलेले आमचे मित्र आनंद कुंभार यांना अंत:करणपूर्वक श्रद्धांजली वाहतो. लातूरपासून
धारेश्‍वरापर्यंत झालेल्या सर्व संमेलनांत त्यांचा सहभाग होता. आज ते आपल्यात नाहीत. त्यांची उणीव प्रकर्षाने भासते.

*काशीपीठ आणि महाराष्ट्र*
काशीपीठातर्फे यापूर्वी २००८ साली वीरशैवांचे सर्वभाषिक संमेलन डॉ. एम. कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. त्यात मीही सहभागी झालो होतो. काशीपीठाचा महाराष्ट्राशी प्राचीन काळापासून संपर्क आहे. लिं. जगद्गुरू शिवलिंग शिवाचार्य (८२ वे जगद्गुरू) आणि लिं. जगद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य (८३ वे) हे दोन जगद्गुरू महाराष्ट्रातील अनुक्रमे सोलापूर व तासगाव या मठसंस्थानचे अधिपती होते. ८४ वे लिं. जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य हे तेलंगणा भागातून (मोगलाई) आले होते. ८५ वे जगद्गुरू विश्‍वेश्‍वर शिवाचार्य आणि ८६ वे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हे कर्नाटकातील असूनही हे उभयता महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी मानतात. लिं. जगद्गुरू शिवलिंग शिवाचार्य व त्यानंतरचे लिं. पंचाक्षर शिवाचार्य यांनीच प्रथम महाराष्ट्रात संचार करून धर्मजागृती घडवून आणली. लिं. जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य हे प्रकांड पंडित होते. त्यांनी ‘काशीपीठाचे प्राचीनत्व’ व ‘वीरशैव मठ व मंदिरे’ ही दोन पुस्तके मराठीत लिहिली आहेत. पूर्वी जगदगुरूंना संचार करणे अवघड होते. सुदैवाने लिं. ज. विश्‍वेश्‍वर शिवाचार्य स्वामीजी (८५ वे) व विद्यमान काशीजगद्गुरू महास्वामीजींना दळणवळणाच्या सोयीमुळे मोठ्या प्रमाणात संचार करता येत आहे. उभय जगद्गुरूंनी आपल्या अमोघ वक्तृत्व आणि धर्मोपदेशाने संपूर्ण महाराष्ट्र आपलासा केला आहे व तीच आपुलकीची भावना महाराष्ट्रीय वीरशैवांच्या अंत:करणांत आहे. 

*वीरशैव लिंगायत एकच!*
वीरशैव धर्म हा देशातील प्राचीन धर्म आहे. त्यालाच बोलीभाषेत लिंगायत असेही म्हणतात. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व साहित्याचे अवलोकन केले असता दोन्ही नावे एकच आहेत, अशी सर्व महाराष्ट्राची भावना आहे. या धर्मात जरूर दोन भेद आहेत. पंचाचार्यांना मानणारा वर्ग सनातन म्हणून ओळखला जातो तर म. बसवेश्‍वर आदी शिवशरणांना मानणारा वर्ग हा सुधारकी असून पुरोगामी मानला जातो. कोणत्याही धर्मात अगदी जगातला सर्वांत मोठा धर्म ख्रिश्‍चन किंवा मुसलमान धर्मांत दोन विचारधारा तसेच बौद्ध, जैन आणि अनेक धर्मांत, पंथांत अशी द्विविध विचारसरणी आढळते. त्यामुळे वीरशैव आणि लिंगायत हे दोन शब्द महाराष्ट्रात, मराठी साहित्यात व महाराष्ट्रीय जनामनात वेगळे न समजता एकच मानणारे बहुसंख्य आहेत. या विषयावर गेल्या आठशे वर्षांपासून चर्चा, वादविवाद व दावे प्रतिदावे केले जात असले तरी महाराष्ट्र वीरशैवांचा मानदंड असलेल्या संतशिरोमणींनी आपल्या ‘परमरहस्य’ ग्रंथात 

पांची आचार्य शिवाचाराशी मूळ । तयापासाव शिवाचार सकळ ।
वीरशैव मार्ग प्रबळ । विस्तार जाहला ॥ १६-१० 
तोचि मुळीचा शिवाचार । कल्याणी अवतरला बसवेश्‍वर ।
त्यानेही केला विस्तार । शिवाचाराचा ॥ १६-११
कोन्ही म्हणती शिवाचार नवा झाला । बसवेश्‍वरापासून विस्तारला ।
ते नेणोनि बोलते बोला । अज्ञानपणे ॥ १६-१२
जहींचा शिव तहींचा शिवाचार । नवा झाला म्हणती ते पामर ।
अनादि शिव तरी शिवाचार । अनादिसिद्धचि असे ॥ १६-१३

मन्मथस्वामींच्या या बिनतोड युक्तिवादापुढे वेगळे म्हणणार्‍यांची डाळ कदापि शिजणार नाही. अलीकडे मन्मथस्वामी आमचेच आहेत हे सांगण्याची चढाओढ नव लिंगायतवाद्यांमध्ये लागलेली आहे. त्यांनासुद्धा मन्मथ माऊलींच्या वरील मांडणीचे खंडण करणे शक्य झालेले नाही ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.

*अन्य संप्रदायांशी संबंध*
कर्नाटकातील वीरशैवांशी महाराष्ट्रातील वीरशैवांची मूळ नाळ जोडली असली तरी महाराष्ट्रातील इतर पंथ-धर्मांच्या निकट सान्निध्याने येथील वीरशैवांची भूमिका ही समन्वयशीलतेचीच राहिली आहे. वारकरी पंथ हा वैष्णव संप्रदाय असून तो शिवालाही तितकेच मानतो, म्हणून वारकरी संप्रदायाचा आणि मराठी वीरशैव संतांच्या साहित्याचा एक परस्परानुबंध आहे. इतकेच नव्हे तर वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संतांवर वीरशैव विचारांचा प्रभाव जाणवतो. या बाबतीत ज्ञानेश्‍वरांच्या ‘गुरु लिंग जंगम त्याने दाविला आगम’ या मार्मिक उल्लेखाकडे पाहावे लागते. तसेच संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर हे त्यांनी लिहिलेल्या शडुस्छळी (षट्स्थल) या ग्रंथावरून ते वीरशैव तत्त्वविचाराने प्रभावित होते हे स्पष्टपणे जाणवते. महानुभाव संप्रदायातील अनेक संज्ञा वीरशैवांच्या तत्त्वविचारातून घेतल्याचे प्रा. र. मु. भुसारी यांनी सप्रमाण मांडले आहे. दत्त, समर्थ, नागेश, चिम्मड, चिदंबरम्, मुडलगी, सकळ मत संप्रदाय आदी महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील संप्रदायांचे साहित्य आणि वीरशैव मराठी साहित्य यांचा संबंध अनेक स्तरांवर जाणवतो. अधिक विस्तृत स्वरूपात सांगायचे तर वारकरी पंथ हा शिवाशी निगडित असल्यामुळेच मल्लप्पा वासकर, वीरनाथ महाराज औसेकर व गो. शं. राहिरकर या वीरशैव घराण्यातील व्यक्तींना वीरशैव व वारकरीत्व एकत्र वागविताना संकोच वाटत नाही. शिखरशिंगणापूरच्या शांतलिंगस्वामींच्या शिष्यांना कृष्णप्पा-जयराम स्वामींना वडगाव मठाची गादी ‘जंगमाची गादी’ म्हणून चालविताना अडचण वाटत नाही. गुरुदेव रानडे यांच्यावर रेवणसिद्धांचा प्रभाव होता. सकलमत सांप्रदायी माणिकप्रभू हे रेवणसिद्धांना मानतात. म्हणूनच त्यांनी अनेक वीरशैवांचे कुलदैवत असलेल्या केतकी संगमेश्‍वरावर ‘संगमेश्‍वर माहात्म्य’ लिहून आपली श्रद्धा प्रकट केली आहे. बसवलिंग या वीरशैव संतकवीने रामदासी संप्रदायातील जयरामस्वामींना पित्याप्रमाणे मानून त्यांची सेवा केली व स्वत:ला ‘जयरामात्मज’ही म्हणवून घेतले. गुरूला महत्त्व देणारा दत्तसंप्रदायही वीरशैवांना जवळचा वाटतो. महाराष्ट्रात वीरशैवांनी कट्टरता न आणता या भूमीशी समरस होण्याची लवचिकता दाखविली म्हणूनच सदुंबरे (जि. पुणे) येथील पंचमवाणी असलेले गवरशेट यांना तुकारामांचा टाळकरी होण्यात संकोच वाटला नाही. तसेच पुण्याचेच वीरशैव असलेले रामचंद्र बापूशेट उरवणे सावकार हे महात्मा ज्योतीराव ङ्गुले यांच्या सत्यशोधक चळवळीत सक्रिय भाग घेतात. हे सर्व महाराष्ट्रातील उदारमनस्क वीरशैवांच्या समन्वयशीलतेचे प्रतीक आहे.

*दृष्टिक्षेपात वीरशैव मराठी साहित्य*

अ : 

(१)ओवीग्रंथ- १. आगम ग्रंथ, २. पुराण ग्रंथ, ३. सिद्धान्त/तत्त्वज्ञान आधारग्रंथ, ४. शरण पुराणे, ५. लघुग्रंथ, ६. पूजाव्रतकथा.

(२) अभंगगाथा- १. मन्मथस्वामीपासून ते रेवणसिद्ध शिवाचार्य परंडकर यांचेपर्यंतचे विविध गाथे

(३) स्फुट कविता-  १. पदे, २. आरत्या, ३. भारुडे, ४. लावणी, ५. पोवाडे, ६. गीते, ७. खंडकाव्य, ८.पाळणे, ९. स्तोत्रे/अष्टके, १०. व्हडपे



१. बखर, २. लेखसंग्रह, ३. चरित्र, ४.आत्मचरित्र, ५. गौरवग्रंथ, ६. स्मृतिग्रंथ, ७. कथा, ८. कादंबरी, ९. एकांकिका/ नाटके, १०. संशोधन/समीक्षा



अनुवाद संस्कृत व कन्नडमधून. तसेच वचनानुवाद.



सा. ‘प्रबोधरत्न’ (१८८४) ते आजपर्यंतची अनेक नियतकालिके



१. संस्था अहवाल, २. स्मरणिका, ३. विविध परिषदा, सभा, साहित्य संमेलनांतील भाषणे.

*वीरशैव मराठी वाङ्मयाचे पायाभूत कार्य*
मुद्रणालये निघण्यापूर्वी मन्मथादी संतांचे वीरशैव साहित्य हस्तलिखित स्वरूपात होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वकाळात लिं. पारलिंग प्रभूअय्या बार्शीकर, म. सं. देवमाले, गंगाधर शिवाचार्य व त्यांचे शिष्य बाळाबुवा कबाडी, धर्मवीर देशिकेंद्र महाराज, चन्ना वारद, विरूपाक्ष शेटे यांनी परमरहस्य, मन्मथादी संताचा गाथा, गुरुदास विरूपाक्ष गाथा व बाळाबुवांचा गाथा तसेच सिद्धान्तसार, वीररहस्यासारखे ग्रंथ मुद्रित केले. पुण्यश्‍लोक अप्पासाहेब वारद यांनी सुमारे ७५-८० ग्रंथ प्रकाशित केले, जे आता फार दुर्मिळ झाले आहेत. मुंबई राज्याचे माजी मंत्री लिं. म. पु. पाटील यांनी वीरशैव संघ स्थापून त्याद्वारा वीरशैव मासिक व ‘लीला विश्‍वंभर’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातील काही मठाधीशांनी छोटे-मोठे ग्रंथ प्रकाशित केले. काशीपीठानेही वीरशैवांचे सिद्धान्तशिखामणी, लिंगधारण चंद्रिका व वीरशैवरत्न असे अनेकानेक ग्रंथ प्रकाशित केले. या मूळ पायावर पुढच्या संशोधकांना-अभ्यासकांना आपले संशोधनकार्य व अभ्यास करता आला.

*काशीपीठाचे मौलिक वाङ्मयीन कार्य*
१९८९ साली काशीपीठावर आरूढ झाल्यानंतर विद्यमान जगद्गुरू पूज्य डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी ‘शैवभारती शोधप्रतिष्ठान’ची स्थापना करून त्याद्वारे ग्रंथप्रकाशनाच्या कार्याला मोठ्या प्रमाणात गती दिली. शिवागमांचे आणि काही उपनिषदांचे हिंदी अनुवाद, पारमेश्‍वरागम व चंद्रज्ञानागम या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद, पारमेश्‍वरागमाचा तेलुगू अनुवाद यांबरोबरच अनेक हिंदी-इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील विद्यापीठांतून मान्य झालेले वीरशैव मराठी साहित्यावरील दहा शोधप्रबंध प्रसिद्ध केले. त्यामुळे वीरशैव साहित्य मुख्य मराठी प्रवाहाशी जोडले जाऊन अनेक अभ्यासकांनी त्याची नोंद घेतली. पूज्य काशीमहास्वामीजींनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’वर केलेल्या आशीर्वचनांचे संकलन/अनुवाद/संपादन डॉ. शे. दे. पसारकरांनी २००१ साली केले. तो ग्रंथ ‘जन्म हा अखेरचा’ या नावाने काशीपीठाने प्रकाशित केला. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या ग्रंथाच्या लाखावर प्रती वितरित झाल्या असून हा ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचला आहे. 

वीरशैवांचा प्रमाणग्रंथ ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’चा पूज्य महास्वामीजींनी स्वत: कन्नडमधून अनुवाद केला. त्यानंतर काही वर्षांत या ग्रंथाच्या संस्कृत, तेलुगू, मलयालम्, हिंदी, उडिया, नेपाळी, रशियन आदी १९ भाषांत त्या त्या भाषांतील विद्वानांकडून अनुवाद करून घेऊन हे ग्रंथ प्रकाशित केले. एका मोबाईल अ‍ॅपमध्ये ते समाविष्ट करून गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले. ते ग्रंथ डाऊनलोड करण्याचीही सोय करून देण्यात आली. आतापर्यंत एक लाख लोकांनी डाऊनलोड करून घेतले आहे. 

*‘श्रीसिद्धान्तशिखामणी’चे विविध मराठी अवतार*
पहिल्या अ.भा. वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सिद्धहस्त लेखक/संपादक डॉ. शे. दे. पसारकरांनी श्रीसिद्धान्तशिखामणीचे ओवीरूपात ‘श्रीसिद्धान्तशिखामणितत्त्वामृत’, अभंगरूपात ‘श्रीसिद्धान्त-शिखामणी अभंगगाथा’ व अनुष्टुभ् छंदात ‘रेणुकगीताई’ असे तीन रूपबंधांत अनुवाद केले. त्यामुळे श्रीसिद्धान्तशिखामणी ग्रंथाचे विविध रूपांत आपणांस दर्शन घडत आहे. याशिवाय ‘श्री जगद्गुरू पंचाचार्य विजय’, ‘मन्मथचरितामृत’ व ‘रमतेरामकथामृत’ असे ग्रंथ सुगम, सरस व रसाळ अशा ओवीछंदात रचले. हे सर्व ग्रंथ अत्यंत लोकप्रिय झाले असून हे मौलिक प्रकाशन कार्य काशीपीठाकडून घडले आहे. या सर्व ग्रंथांची विविध कार्यक्रमांत पारायणेही केली जात आहेत. डॉ. पसारकरांनी श्रीसिद्धान्तशिखामणीचे जे विविध्यपूर्ण दर्शन घडविले आहे त्याने महाराष्ट्रीय वाचकांची जिज्ञासा पूर्ण झाली. तीसेक वर्षांपूर्वी हा ग्रंथ मराठी लोकांना माहीत नव्हता. तो आता महाराष्ट्रातील वीरशैवांच्या घराघरात पोहोचला आहे. काशीपीठाचे व डॉ. शे. दे. पसारकरांचे ऐतिहासिक कार्य नोंद घेण्यासारखे आहे.

प.पू. श्रीकाशीमहास्वामीजींच्या पीएच्.डी. प्रबंधाचा अनुवाद पं. शिवाप्पा खके गुरुजी यांनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी समीक्षा’ या नावाने केला आहे. श्रीकाशीमहास्वामीजींच्या डी.लिट्. प्रबंधाचा अनुवाद डॉ. शे. दे. पसारकर यांनी ‘वीरशैव तत्त्वदर्शन’ या नावाने केला आहे. हे दोन्ही प्रबंध शैवभारती शोधप्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झाले आहेत. मराठी वीरशैव साहित्यातील काशीपीठाचे योगदान सर्वाधिक आहे, याची नोंद घेतलीच पाहिजे. 

*वीरशैव नियतकालिकांचे योगदान*
प्रबोधरत्न (बार्शी १८८४) या पहिल्या साप्ताहिकापासून वीरशैव (सोलापूर), वीरशैवमतप्रकाश (खणदाळे), वीरशैवोत्कर्षमाला (कोल्हापूर), वीरशैव संजीवनी (अमरावती), वीरशैव धर्मरहस्य (देऊर सातारा), मुक्तागुच्छमाला (वडांगळी नाशिक), शिक्षणप्रकाश (लातूर), वीरप्रभा (बार्शी), वीरशैव केसरी (पुणे), वीरशैवगर्जना (बार्शी), विजय (सोलापूर), सा. सुदर्शन (सोलापूर), पाक्षिक संग्राम (मोमिनाबाद), लोकमत (उदगीर), वीरशैव (मुंबई), शिवगंगा (नागपूर), ज्ञानप्रसाद (कोल्हापूर), कपिलधार (चाकूर), शिवशरण (अमरावती), वीरशैव दर्शन (पुणे), लिंगेश्‍वर वाणी (अहमदपूर), धारेश्‍वर (दिवाळी अंक व त्रैमासिक धारेश्‍वर), मन्मथ दर्शन (कळंब), ओम नम: शिवाय (परभणी), विभूतिवैभव (वाराणसी), मन्मथ मंत्र (बीड), श्रीपलसिद्ध दर्शन (साखरखेर्डा), शिवदर्शन (औरंगाबाद), बसवदर्शन (औरंगाबाद), धर्मगंगोत्री (सोलापूर), सिद्धेश्‍वर दर्शन (सोलापूर), वचन ज्योती (उदगीर), शिवभेट (नांदेड), कमलदीप (लातूर), बसवपथ (लातूर), बसवदर्शन (औरंगाबाद), वीरशैव सिद्धान्तामृत (कोल्हापूर), प्रभुप्रसाद (माजलगाव), शिवलिंग दर्शन (औरंगाबाद), शिवसंस्कार (डोंबिवली), जीवनसंगिनी (नांदेड), वीरशैव संहिता (नांदेड), त्रैमासिक संगम (मुंबई) अशी सुमारे १०० पेक्षा अधिक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके गेल्या १०० वर्षांत निघाली. ती अल्पजीवी ठरली. आता केवळ ४/५ नियतकालिके प्रसिद्ध होत आहेत. अशा नियतकालिकांचाही वीरशैव साहित्य समजून घेण्यासाठी, समाजातील चळवळी माहीत होण्यासाठी उपयोग झाला. तसेच या नियतकालिकांनी भरीव असे वाङ्मयीन कार्य करून वीरशैव वाङ्मयाचा प्रवाह वाहता ठेवला.

*वीरशैव संतांची मांदियाळी*
वीरशैवांचे मराठी वाङ्मय बाराव्या शतकापासून लिहिले गेले असावे, पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकापासूनचे वाङ्मय उपलब्ध होत आहे. पंधराव्या शतकातले लिंगदास, रामलिंग, सुजात व शिवलिंग हे कवी अद्याप पूर्णपणे उजेडात आले नाहीत. मन्मथस्वामींचे अन्य शिष्य लिंगेश्वर, बसवलिंग, शिवदास यांचेही संपूर्ण साहित्य हाती लागले नाही. त्यानंतर सत्यात्मज या महत्त्वाच्या कवीची नवीन माहिती उजेडात आली असून त्याचे दोन शिष्य १ रेवाप्पा, २ गुरुपुत्र यांचे काही साहित्य उजेडात आले आहे. त्याच जुन्या पद्धतीचा वापर करून पुढिलांनी म्हणजे गंगाधर शिवाचार्य वडांगळीकर, त्यांचे शिष्य बाबा झळके व बाळाबुवा कबाडे यांचे साहित्य अद्याप अभ्यासक्षेत्रापासून दूर आहे. चन्ना कवी, विरूपाक्ष, शिवगुरुदास व बसवदास यांचेही साहित्य प्रकाशित झाले आहे, होत आहे. तरी पण विश्‍वेश्‍वर शिवाचार्य, मल्लेश्‍वर ऊर्फ काशीनाथ हवा तसेच सिद्धमल शिवाचार्य वैराग यांचेही साहित्य अप्रकाशित आहे. सांगलवाडीच्या रामलिंगाचे ‘अष्टावरण माहात्म्य’ अर्धवट उपलब्ध झाले आहे. शांतलिंगस्वामी, शिखरशिंगणापूर यांचे दोन ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांच्यावरही संशोधन करणार्‍यास खूप वाव आहे.

पारलिंग प्रभुअय्यांनी प्रथम मन्मथगाथा, भारुडे व परमरहस्य प्रकाशित करून वीरशैव संतवाङ्मयाला प्रथम प्रकाश दाखविला. त्या पिढीतलेच धर्मवीर देशिकेंद्र महाराज यांचे ११ अध्यायाचे ओवीबद्ध गुरुमाहात्म्य अद्याप प्रकाशित झाले नाही. तसेच त्यांच्या संग्रहातील विदर्भातील पेंटय्या स्वामी ऊर्फ पंचाक्षरी स्वामी यांचे ‘शिवरहस्य’, ‘प्रभुलिंगलीला’ व ‘सिद्धेश्‍वर माहात्म्य’ हे प्रकाशनाची वाट पाहत आहेत. त्यांचे समकालीन शिवलिंगभाऊ ओझर्डे (देऊर-सातारा), कृष्णप्पा सद्रप्पा कलुरे (चांदा) वै. मा. शेटे, महेश शंकर नागुरे, संग्रामप्पा शेटकार, राचय्या स्वामी निलंगा, शाहीर मुचाटे, शाहीर मेनकुदळे, ना. रा. विभूते (तासगाव) गंगाधर हिरेमठ (सातारा), राम शंभो पुराणिक, वि. तु. चौधरी, कुमार कोठावळे, शि. बा. संकनवाडे, श्रीकांत आळ्ळी आदींचे ग्रंथ व किरकोळ लेखन प्रसिद्ध झालेले आहे. दे. भ. बामणगावकरांनी आपल्या वीरशैव संजीवनीद्वारे वीरशैव वाङ्मयाची भरीव सेवा केली आहे. वीरशैवांनी लघुकथा कशा लिहाव्यात याचेही मार्गदर्शन त्यांनी केले होते. याचवेळचे बं. रे. झुंजे (सोलापूर) हे एक कथाकार होते. त्यावेळी कल्याण शेट्टी हे सोलापूर ‘सुदर्शन’ साप्ताहिक चालवीत, तर पुराणिकशास्त्री ‘विजय’ मासिक काढीत. या काळातील महत्त्वाचे लेखक अंबण्णप्पा शेडजाळे हे पत्रकार व नाटककार होते. 

*यांनीही वीरशैव साहित्याला लावला हातभार*
काशीनाथ-विश्‍वनाथ-आनंद हे सुपेकर घराण्यातील कवी, गणेशअण्णा चौधरी, पं. शिवाप्पा खके गुरुजी, अशोक एडके, बसप्पा वारद, नागय्या लहानकर, महादेव भुसे, ना. गं. कथले, शिवचंद्र माणूरकर, प्रा. विश्‍वंभर गव्हाणकर, मनोहर कल्लावार, अभय कल्लावार, गुरुनाथ वड्डे, प्रा. डॉ. राजकुमार साबळे, गंगाधरराव पटणे, राजेंद्र जिरोबे, रं. प. लोहार, वीरसंगय्या हिरेमठ ऊर्फ मृत्युंजय (बोराळे), प्रा. विश्‍वनाथ थोंटे, एस. जी. हिरेमठ (गुड्डापूर), पां. ना. मिसाळ, सुरेश स्वामी गोरटेकर, पंचप्पा जिरगे, श्रीराम गुळवणे, रेवणसिद्ध जाबा, वसंतराव सांगवडेकर, प्रा. बा. म. चमके, शंभूलिंग मसळी, हनुमंत धोंडिबा नावले (बामणी, लोहा), महादेव बाबूराव मिटकरी (येरमाळा), स्नेहलता स्वामी ‘शिवयोगिनी’, सुशीलाबाई वाकळे, काशीनाथप्पा पैके, जी. एम. मंगलगे, डॉ. बी. एम. डोळे, शं. क. हिरेमठ (कोल्हापूर) यांनीही वीरशैव साहित्याला आपला हातभार लावला आहे. त्यात विशेष म्हणजे रामलिंग स्वामी हरंगुळकर यांची नोंद घ्यायला हवी. हे अल्पशिक्षित असूनही स्वत: अभंग, पदे, आरत्या, पवाडे, भारुडे अशी बहुविध रचना करून हरंगुळ येथून रुद्र प्रकाशन ही संस्था काढून ३०-४० पुस्तके प्रकाशित केली आहेत.

*संशोधनाद्वारा यांनी कळस चढविला*
डॉ. चंद्रशेखर कपाळे, डॉ. सुधाकर मोगलेकर, डॉ. शंकरराव कप्पिकेरी यांच्या काळातील ही पिढी शाळा-महाविद्यालयांतून नुसतीच शिकली नव्हती तर ते मराठी वाङ्मयाचे अभ्यासकही होते. म्हणून ते संशोधनकार्याकडे वळले. डॉ. मोगलेवारांच्या पाठोपाठ डॉ. भी. शि. स्वामी, डॉ. राम तोंडारे, डॉ. शिवशंकर उपासे, डॉ. वैजनाथ फास्के,  डॉ. शे. दे. पसारकर, डॉ. सूर्यकांत घुगरे, डॉ. अशोक मेनकुदळे, डॉ. चंद्रशेखर कपाळे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. शोभा कराळे, डॉ. अनिल काटकर, डॉ. भीमाशंकर बिराजदार, डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. मु. व्ही. बनाळे, डॉ. अनिल सर्जे, डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. उल्हास मोगलेवार, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. सचिदानंद बिचेवार, डॉ. एकता पंकज शेटे, डॉ. शिल्पा कारंजकर, डॉ. संतोषकुमार गाजले, डॉ. कोळी, डॉ. वेदप्रकाश ईश्‍वरप्पा डोणगावकर, डॉ. रत्नाकर लक्षट्टेे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवशरण धाराशिवे, डॉ. व्यंकट पाटील, डॉ. मीनाक्षी हिरेमठ, डॉ. शशिकांत दरगु, डॉ. अपर्णा जिरवणकर व डॉ. जितेंद्र शरणप्पा बिराजदार अशी सुमारे ४० पीएच.डी. प्राप्त अभ्यासकांची नावे आहेत.

मन्मथादी संतांनी जिचे प्रथम पोषण केले, अनेक संपादक/संशोधकांनी खतपाणी घालून वाढविले त्या वीरशैव साहित्याला आता बहर आला आहे. त्याची फळे नवेनवे अभ्यासक/संशोधक चाखत आहेत. मराठी साहित्याच्या प्रवाहाशी एकरूप झाल्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. पन्नास वर्षांपूर्वी वीरशैव वाङ्मय फारसे उपलब्धही होत नव्हते. आज आमच्या डोळ्यांदेखत त्याला आलेले हे भव्य स्वरूप पाहून मनस्वी आनंद होत आहे. तसेच याचे सक्रिय साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे.

*महाराष्ट्रातील मठाधीशांचे साहित्यात योगदान*
महाराष्ट्रात एकेकाळी ८०० मठ होते अशी माहिती ‘वीरशैव मूळस्तंभ’ या १०० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात नमूद केली आहे. आज काळाच्या ओघात त्यांपैकी अवघे ५०-६० मठ आपले अस्तित्व टिकवून आहेत. शांतलिंग हे शिंगणापूरचे मठाधीश असून त्यांचे विवेक चिंतामणी व करण हसुगे (कर्णहंस नव्हे) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शांतलिंग स्वामी उदार मनाचे असल्यामुळे कृष्णप्पा व जयराम स्वामी वडगावकर आदींना त्यांनी शिष्यत्व दिले. अमरावतीचे विरक्त मठाधीश शंकर मृगेंद्र यांचा गाथा प्रसिद्ध असून तो आता दुर्मिळ झाला आहे. वडांगळी मठाचे गंगाधर शिवाचार्य यांनी ‘वीररहस्य’, अभंगगाथा व अनेक लघुग्रंथ रचले आहेत. होटगी मठाचे पूर्व मठाधीश ष. ब्र. चन्नवीर शिवाचार्य यांनी ग्रंथमाला चालवून अनेक छोटे-मोठे ग्रंथ प्रसिद्ध केले. लिं. राचलिंग शिवाचार्य व ष.ब्र. रेवणसिद्ध शिवाचार्य यांनी ‘वीरशैव गर्जना’ हे साप्ताहिक सुमारे ३५ वर्षे अनेक खस्ता खाऊन चालविले. महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांमध्ये त्यांच्याशिवाय पानही हलत नसे. श्रीगुरू रेवणसिद्ध शिवाचार्यांनी अभंगामृत व अभंगसुधा या नावाचे दोन गाथे रचले असून ते प्रसिद्धही झाले आहेत. अहमदपूरच्या ष.ब्र. डॉ. शिवलिंग शिवाचार्यांच्या अभूतपूर्व कार्याला तोड नाही. संतशिरोमणी मन्मथस्वामी यात्रेला ते गेल्या ६५ वर्षांपासून हजारो भक्तांसह पायी दिंडी काढतात. तसेच त्यांनी सिद्धान्तशिखामणी ग्रंथावर स्वतंत्र भाष्य केले आहे. याशिवाय संस्कृती प्रकाशनाद्वारा परमरहस्य, रत्नत्रय, मन्मथ गाथा, शिवानंद बोध, बसवपुराण आदी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांनी मन्मथस्वामींच्या कपिलधार यात्रेला व कार्याला, परंपरेला उजाळा दिला आहे. 

माजलगावचे ष.ब्र. प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य यांनी आपल्या मठ संस्थानातर्फे अनेक ग्रंथ प्रकाशित केले असून मन्मथ जन्मोत्सवाच्या वेळी कपिलधार येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे ते आयोजन करतात. ष.ब्र. नीळकंठ शिवाचार्य, मठ संस्थान धारेश्‍वर यांच्यातर्फे अनेक मासिके, दिवाळी अंक, गुरुपौर्णिमा अंक व अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. साखरखेर्डा हे विदर्भातील पुरातन मठ संस्थान असून सुमारे १००० वर्षांचा इतिहास असलेला मठ आहे. त्यांनीही श्रीपलसिद्ध दर्शन मासिक व बृहद् लक्ष्मण गाथा, सिद्धेश्‍वर माहात्म्य, गाथा पारायण प्रत व इतर अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. याशिवाय ष.ब्र. डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधाम, ष.ब्र. दहिवडकर, तमलूरचे शिवाचार्य, शिंगणापूरच्या भांडारगृहाचे शिवाचार्य, हावगी स्वामी मठ संस्थान, उदगीर, माणूरचा जहागीरदार मठ व डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मठ संस्थान, मुखेड यांनी अलीकडेच अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. अनेक मठांकडून छोटीमोठी पुस्तके, मासिके, नियतकालिके चालविली जातात. थोडक्यात वीरशैव मराठी वाङ्मयाच्या वाढीसाठी, प्रसारासाठी महाराष्ट्रातील अनेक शिवाचार्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

*वीरशैव महिलांचे मराठी साहित्य*
म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपतीच्या समाजजागरणामुळे स्त्रियांच्या चळवळीला महाराष्ट्रात वेग आला. शाळेत कधीही न जाणार्‍या मुली शाळेत जाऊ लागल्या. पुरुषासारखे लिहू लागल्या. हे होण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. या शतकात स्त्रीशिक्षणाला बर्‍यापैकी महत्त्व आले. स्त्रिया शिकू लागल्या, लिहू लागल्या आणि आपली ठाम मते मांडू लागल्या.

वीरशैव समाज तर व्यापारी वृत्तीचा. मुलींना शिक्षण कशाला पाहिजे? असे म्हणणारा. तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभी वीरशैव स्त्रिया लिहू लागल्या. त्याचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. सौ. गंगाबाई पटणे (अक्कलकोट), गिरिजाबाई ओझर्डे, शांताबाई बाप शिवलिंग ओझर्डे (देऊर सातारा), रत्नमाला कुर्‍हे, महादेवी वाघमारे, शांता गं. सातेकर अशा काही स्त्रियांचे लेखन ‘शिक्षण प्रकाश’, ‘वीरशैव संजीवनी’ या नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागले. प्रथम तर पुरुषांनाच स्त्रियांच्या प्रश्‍नावर लिहावे लागत असे. आता त्या स्वत: आपले प्रश्‍न मांडू लागल्या. क्वचित कथाही लिहीत होत्या. त्रिवेणीबाई इसापुरे व भागीरथीबाई कटाप या विदुषी त्या काळात प्रसिद्ध झाल्या.

*भावंडी : आद्य वीरशैव अभंगकर्ती*
भावंडी ही वीरशैवांच्या पाटील कुळात जन्मलेली व लहान वयातच वैधव्य प्राप्त झालेली स्त्री. पुढे गुरूंच्या मार्गदर्शनाने तिने आपले आध्यात्मिक जीवन वाचन-लेखनाकडे वळविले आणि भावंडी वीरशैवांची पहिली कवयित्री ठरली. ती स्वत: वैराग्यमूर्ती होती. तिने कठोर शब्दांत आपल्या भावना अभंगबद्ध केल्या आहेत. तिने आपले मार्गदर्शक संगशेट्टी पाटील ऊर्ङ्ग गुरुदास यांच्या गाथ्यात स्वत:चे अभंग समाविष्ट करून गुरुदास गाथा प्रकाशित केला. काळाबरोबर स्त्रीशिक्षणाचे महत्त्व जाणवत होते. त्यातून बोध घेऊन शिक्षणाला प्राधान्य मिळू लागले आणि बरोबरीने नसले तरी बर्‍यापैकी स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली.

*प्रमुख वीरशैव लेखिका*
लिं. जयदेवीताई लिगाडे या मराठी-कन्नड भाषा जाणत होत्या. त्यांनी दोन्हीही भाषांत लिखाण केले. महात्मा बसवेश्‍वरादी शरणांच्या वचनांचे अनुवाद केले. सिद्धवाणी, बसवदर्शन, शून्य संपादने, सिद्धलिंग वाणी, वचनामृत, सिद्धरामांची त्रिविधी ही त्यांची प्रमुख ग्रंथरचना. त्यांची कन्या शशिकला मडकी व नात सौ. स्वरूपा बिराजदार यांनीही भरपूर लेखन, अनुवाद केले आहे. सिद्धान्तशिखामणीच्या अभ्यासिका सौ. महानंदाताई खके यांनी लक्ष्मण महाराजांच्या शिवपाठावर भाष्य केले.

रेखा अष्टुरे, प्रमिलाताई कोठाळकर, शालिनी दोडमणी, शकुंतला अनसिंगकर, स्नेहलता स्वामी, शिवाबाई पाटील, सौ. रजनीताई मंगलगे आदींनी केलेले लेखनकार्य मौलिक आहे. प्रा. सौ. लावण्यवती चौधरी यांनी ‘बाप्पा : एक आनंदयात्री’, ‘भक्ताश्रमिका कलावती’ ही दोन चरित्रे आपल्या आईवडिलांविषयी लिहिली आहेत. तसेच दिवंगत बंधू सतीश याचे ‘तालयात्री’ नावाचे चरित्र लिहिले असून या तीनही ग्रंथांत वीरशैव कुटुंबातील जीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडते. अल्पशिक्षित असलेल्या सौ. मालती आचमारे यांनी त्यांचे गुरू ष.ब्र. सिद्धलिंग शिवाचार्य यांचे चरित्र, गुरूवर, शिवावर भक्तिगीते व पोवाडेही रचले आहेत. डॉ. श्यामा घोणसे व डॉ. सौ. शोभा कराळे, डॉ. सुचिता किडीले यांनी वीरशैव साहित्यावर पीएच्.डी. मिळविली आहे. स्वाती साखरकर (कारंजा लाड) यांचे संतशिरोमणी मन्मथस्वामींच्या अभंगांवरील ‘म्हणे मन्मथशिवलिंग’ हे भाष्य आणि ‘कथा श्रीरमतेरामांची’ हे ललित संतचरित्र काशीपीठाने प्रसिद्ध केले आहे.

*वीरशैवेतरांचे वीरशैव साहित्यास योगदान*
वीरशैव मराठी साहित्य प्रकाशनाच्या पायाभरणीत अनेक वीरशैवांचा वाटा महत्त्वाचा आहे. वीरशैव समाज मूळचा व्यापारी पेशाचा. त्यांचा लेखनाशी केवळ हिशोब लिहून ठेवण्यापुरताच माहीत होता. तेव्हाचे शिक्षणाचे प्रमाणही कमी अशा काळात अनेक वीरशैवेतरांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामध्ये कै. वि. ल. भावे, मुमुक्षुकार ल.रा. पांगारकर, कवि-काव्यसूचीकर्ते गो. का. चांदोरकर, डॉ. पां. ना. कुलकर्णी, डॉ. पंडित आवळीकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, प्रा. अ. का. प्रियोळकर, ज. शा. देशपांडे, कृ. पां. कुलकर्णी, बाळाचार्य खुपेरकर शास्त्री, ग. वा. तगारे, अनिल बडवे, नरहरशास्त्री खरशीकर, ना. ब. जोशी, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. निर्मलकुमार ङ्गडकुले, डॉ. अशोक कामत, डॉ. यू. म. पठाण, गं. ना. मोरजे, र. म. भुसारी, डॉ. अ. ना. देशपांडे, प्रा. अ. रा. तोरो, प्रा. डॉ. र. बा. मंचरकर, सु. ग. जोशी (लातूर), प्रा. ल. रा. नसिराबादकर, प्रा. डॉ. शिवाजीराव गऊळकर, र. रा. गोसावी, गं. दे. खानोलकर, सुहास पुजारी, प्रा. धोंडिराम वाडकर, डॉ. संजीवकुमार पांचाळ, प्रा. डॉ. माणिक धनपलवार, प्रा. डॉ. सतीश बडवे अशा अनेकानेक वीरशैवेतर अभ्यासकांनी, संपादकांनी वीरशैव साहित्याचा परिचय करून दिला. इतिहासात वीरशैव मराठी साहित्याची नोंद केली. वेगवेगळ्या रूपांत वरील वीरशैवेतरांनी वीरशैव मराठी साहित्याच्या उभारणीत, उत्कर्षात, प्रकाशित करण्यात आपली भूमिका महत्त्वपूर्णरित्या बजावली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वीरशैवातून अनेक अभ्यासक-संशोधक पुढे आले आहेत.

वीरशैव मराठी साहित्याचा एक भाग असलेले बसवेश्‍वरादी अनेक शरणांची चरित्रे, वचने, वचनानुवाद या कामी अनेक वीरशैवेतरांनी मौलिक कामगिरी केली आहे. यात अविनाश हरि लिमये, म. म. देशपांडे, प्रा. कृ. ब. निकुंब, कॉ. कृष्णा मेणसे, डॉ. न. म. जोशी (पुणे), प्रा. डॉ. प्रभाकर पाठक, प्रा. ल. का. मोहरीर, प्रा. गौतम गायकवाड (अंबाजोगाई), प्रा. अर्जुन जाधव, गंगाधर गिते, प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे, सुभाष देशपांडे, प्रा. डॉ. विजया तेलंग, प्रा. वि. शं. चौघुले, प्रा. रा. तु. भगत, डॉ. सुधाकर देशमुख (उदगीर) इ. चा समावेश असून त्यांचे हे कार्य निश्‍चितच कौतुकास्पद व प्रेरक आहे. त्यांच्या कार्याबद्दल वीरशैवांनी कृतज्ञता बाळगून त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी लागेल इतके त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.

*कीर्तनकारांची भूमिका*
वीरशैव समाज जागा ठेवण्याचे कार्य गुरूंबरोबरच संतांनी कीर्तनमाध्यमाचा आश्रय घेऊन केले आहे. कीर्तनकारांचा इतिहास सुमारे ४०० वर्षांचा आहे. शिवलिंग स्वामी, मन्मथस्वामी, लिंगेश्‍वर, बसवलिंग व शिवदास हे प्रारंभीचे कीर्तनकार. त्यांनी कीर्तनसंस्थेची उभारणी केली. त्यासाठी अभंगादी काव्यरचना केली आणि त्यातून पुढे शिष्यपरंपरेने हे चालत राहिले आहे. मधल्या काळात भजन परंपरेला उतरती कळा लागली होती. केवळ बार्शी, अहमदपूर, चाकूर, परळी, शिरूर अनंतपाळ, नागापूर, लातूर इ. ठिकाणी चन्नाप्पा वारद, गुरुदास साखोळकर आणि सदानंदबुवा जोडजवळेकर, शिवगुरुदास व बसवदास यांच्या द्वारा मंदगतीने चालत होती. परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्यांनी १९५५ ला चापोलीहून कपिलधारला पायी दिंडी काढली व या शिवभजन परंपरेला त्यांनी उजाळा दिला. त्यांच्या प्रेरणेतून आज ४००/५०० ठिकाणी शिवनाम सप्ताह चालू असून ३००/४०० कीर्तनकारांची ङ्गळीही उभारली आहे. खरा समाज गुरू आणि संतांनी जागृत ठेवला आहे. त्या संतांपासून प्रेरणा घेऊन कीर्तनकार पुढे येत आहेत. त्यामुळे सर्व समाजाला आपले संत, आपले साहित्य माहीत होऊ लागले. परमरहस्य ग्रंथ घराघरात पोहोचला. त्याची पारायणे महाराष्ट्रभर होत आहेत. लेखक-अभ्यासक-संशोधक संतांचे ग्रंथ संपादून प्रकाशित करतात. नवे नवे अभंग शोधून काढतात. त्या अभंगांवर कीर्तनकार भाष्य करतात, अर्थ सांगतात, त्याचे महत्त्व पटवून देतात. थोडक्यात संशोधकांनी निर्माण केलेले साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करतात. पण दुर्दैवाने या उभयतांचा संपर्क नाही. एकमेकांना एकमेकांची आवश्यकता आहे हे मान्य नाही असे दिसते. खरे तर हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कीर्तन शिकण्याच्या शाळा आता आपल्याकडे तुरळक सुरू झाल्या आहेत. त्याचे प्रमाण वाढले पाहिजे. कीर्तनकारांनी आपली कीर्तने लिहून पुस्तकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यातून नव्या कीर्तनकाराला दिशा मिळते. मार्गदर्शन होते. वीरशैवांची अशी काही कीर्तने प्रथम डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लिहिली होती. अलीकडे मन्मथप्पा डांगे, शि. बा. स्वामी मानखेडकर, भुसे, नावंदे, महावीर ब्रिदावळे वगैरेनी कीर्तने लिहून प्रकाशित केली आहेत. पण हे प्रमाण अल्प आहे. प्रसिद्धीची कितीही नवी नवी माध्यमे आली तरी छापील माध्यमाला पर्याय नाही. याचा विचार करून यू ट्यूबपेक्षा प्रभावी माध्यम मुद्रण आहे हे लक्षात घ्यावे. यू ट्यूबवर तुमची छबी दिसते तर मुद्रित कीर्तनामुळे विचारांना खोली प्राप्त होते व ते विचार ‘अक्षर’ स्वरूपात टिकून राहतात. कीर्तनकारांनी साहित्यप्रसाराला प्राधान्य द्यावे. ग्रंथ मिळवावेत, वाचावेत, आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे आणि ते लोकांना वाटावे तरच खरे प्रबोधनकार ठरतील.

अलीकडची तरुण कीर्तनकार मंडळी जिज्ञासू आहेत. त्यापैकी पाच-सात तरुण कीर्तनकारांनी संताच्या समाधिदर्शनाला जाण्याचे नियोजन केले. मला त्याबद्दल त्यांनी विचारणा केली. मी सांगितल्याप्रमाणे ते सर्व ठिकाणी गेले नाहीत. पण त्यांचा हा प्रयत्न निश्‍चित चांगला आहे. पुन्हा चांगले नियोजन करून सर्व संतांच्या समाधिस्थानी जावे.

*सामाजिक ऐक्य : एक ज्वलंत प्रश्‍न*
कोणताही समाज एकत्र असला तर त्या समाजाची प्रगती होते, पण आपल्या वीरशैव समाजात लवकर मतैक्य होत नाही. म्हणून समाज आज मागे पडत आहे. समाजात चांगली गुणवत्ता आहे, पण त्या गुणवत्तेचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्र-कर्नाटकात व इतर राज्यांत अनेक संघटना निर्माण झाल्या, पण त्या टिकल्या नाहीत. वीरशैव तरुण संघ, निजाम प्रांतिक वीरशैव परिषद, राष्ट्रीय वीरशैव समाज संघ, महाराष्ट्र वीरशैव सभा, बसवसेना, बसवब्रिगेड, मध्य दक्षिण वीरशैव परिषद, वीरशैव युवकाची ‘शिवा’ संघटना आदी निघाल्या आहेत. नवनव्या संघटना निघाल्याने नेत्यांचा विकास होतो, समाज तिथेच राहतो. महाराष्ट्रात केवळ तीन-चारच संस्था शंभर वर्षांपासून कार्यरत आहेत. कायम टिकून आहेत. त्यात यवतमाळची वीरशैव संघटना, कै. भिकुबाई मेनकुदळे (पुणे) अशा काही संस्थांचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्र वीरशैव सभा ही संघटना काही कारण नसता आपसातील स्पर्धेमुळे, इर्षेमुळे मरणप्राय अवस्थेत पोहोचली आहे. शिवा संघटना ही प्रा. मनोहर धोंडे यांच्या बलदंड नेतृत्वाखाली धडाडीने कार्य करीत आहे. प्रा. मनोहर धोंडे यांना प्रश्‍नांची जाण आहे व ते कसे सोडवावे याचे भान आहे. त्यांनी समाजाचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. समाजबांधवांनी संस्थांच्या उभारणीत आपापसातला मतभेद, हेवेदावे टाळून खंबीरपणे पाठीशी राहून त्या सक्षम कशा बनतील व समाजाचे प्रश्‍न समर्थपणे मार्गी लागतील याची काळजी घ्यायला हवी. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.

*अभ्यासक/संशोधकांना आवाहन*
वीरशैव मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी/संशोधकांनी काही महत्त्वाच्या बाबी विशेषत्वाने लक्षात घ्यायला हव्यात. त्या प्रामुख्याने अशा:-

१. अभ्यास-संशोधनातला तोचतोपणा टाळून इतिहास, समाजशास्त्र, दैवतशास्त्र, स्थलमाहात्म्य, लोकसाहित्य अशा बहुआयामी मार्गाचा अवलंब करून अभ्यास मांडावा.

२. महाराष्ट्रात औरंगाबाद, धुळे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औंध (सातारा), तेर, नांदेड इ. ठिकाणी हस्तलिखित संग्रहालये आहेत. त्यात कितीतरी दुर्मिळ हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ व नियतकालिके आहेत. ते मिळवावेत व त्याचा अभ्यास करावा.

३. महाराष्ट्रातील शासनाच्या विविध ठिकाणच्या दप्तरखान्यात कितीतरी वीरशैवविषयक कागदपत्रे उपलब्ध आहेत. विशेषत: पुणे दप्तरखान्यात शिरसंगी, वंटमुरी, कित्तूर, बेलवडी व नवलगुंद येथील वीरशैव संस्थानिकांचा ऐतिहासिक पत्रव्यवहार व वीरशैव-लिंगायतांच्या इतिहासाची कागदपत्रे असलेले शेकडो ‘रुमाल’ उपलब्ध असून त्यात लक्षावधी कागदपत्रे आहेत. त्यासाठी मोडी शिकून ही कागदपत्रे अभ्यासून त्यावर संशोधनपर लेखन करावे.

४. प्राचीन संतांची निवासस्थाने, समाधिस्थाने, जन्मस्थाने तसेच त्यांच्या परंपरेतील मठ असलेल्या गावांची वर्णनात्मक स्थानसूची व त्याचा नकाशा (Atlas) तयार करावा.

५. वीरशैव संताचे/लेखकाचे वारसदार, त्यांच्या वंशावळी व पत्त्यासह यादी करणे.

६. महाराष्ट्रातील विविध मठांचा इतिहास, मठातील कागदपत्रे व पोथ्या मिळवून जतन करून प्रकाशितही केल्या पाहिजेत.

७. वीरशैवविषयक ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे जे पुणे, मुंबईच्या शासकीय ग्रंथालयांत उपलब्ध आहेत त्यांचाही अभ्यास होऊ शकतो.

*संमेलनपूरक उपक्रमाविषयी सूचना*
या संमेलनाच्या माध्यमातून साहित्योपयुक्त बाबी सुचवू इच्छितो.

१. अ.भा. वीरशैव साहित्य संमेलने प्रतिवर्षी न चुकता आयोजित करावीत.

२. काशीपीठातर्फे कै. कपाळे साहित्य पुरस्काराबरोबर इतर ५/६ पुरस्कार दिले जातात. अशा प्रसंगी दिवसभर एखाद्या विषयावर चर्चासत्र ठेवून चर्चासत्राच्या समारोपाच्या वेळी हे पुरस्कार दिले जावेत.

३. एक दिवसीय साहित्य संमेलने आयोजित करावीत. जेणेकरून त्याचा लाभ नव्या व होतकरू अभ्यासकांना प्रेरणादायी ठरेल.

४. गदगच्या मठाने जशी चरित्रमाला काढली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील वीरशैवांच्या साहित्य, कला, संस्कृती, समाजकारण  व राजकारणातील प्रमुखांची चरित्रमाला निर्माण करावी.

५. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मठाने आपला इतिहास लिहून घ्यावा. मठाच्या शिष्यपरंपरेची सूची तयार करावी.

६. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वीरशैवविषयक साहित्य उपलब्ध आहे. त्याचे अनुवाद करून मराठी भाषकांना उपलब्ध करून द्यावीत.

७. जैन समाजाप्रमाणे स्वतंत्ररित्या इतिहास परिषदा व कथा-कादंबरी लेखनासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात.

८. वीरशैव विश्‍वकोशाची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करून ते प्रकाशित करावे.

९. शास्त्रीय पद्धतीने (दाते ग्रंथसूचीप्रमाणे) वीरशैवांच्या मराठी ग्रंथांची व ग्रंथकारांची अद्ययावत सूची करावी.

*समारोप*
मागील दहा वर्षांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आला आहे. काय भाग्याची गोष्ट आहे की, हे संमेलन ज्ञाननगरी काशीमध्ये संपन्न होत आहे. योगायोगाने संमेलनाच्या आयोजकांच्या भूमीत हे संमेलन पार पडत आहे. हा दुग्धशर्करायोग मानायला हवा. याप्रसंगी मी कृतार्थ भावनेने काशीपीठाचे, सर्व अभ्यासकांचे, संशोधकांचे आणि उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरे तर हे सर्व मांडताना माझ्या भावना शब्दांत पकडणे शक्य होत नाही. माझ्या भावना संत शिवदासांच्या शब्दांत व्यक्त करून मी आपला निरोप घेतो.

धन्य आजी दिन भला । आम्हा थोर लाभ झाला ॥१॥
बहुत सुकृताच्या गाठी । तेणे झाल्या संतभेटी ॥२॥
मूळ पूर्वजांचा ठेवा । तेव्हा बालकासी मेवा ॥३॥
शिवदास देखियले । शिवयोग्याची पाऊले ॥४॥

* * *

कै.र.व.महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा

कै.र.व.महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा 



सोनपेठ (दर्शन):-  

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन डाॅ.गणेश मुंढे, संस्थाध्यक्ष मा. परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषा संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डाॅ.बालासाहेब काळे यांनी केले.मराठीचा नव्या विज्ञान तंत्रज्ञानातील वाढता वापर हे भाषेच्या उत्कर्षाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डाॅ. सा.द. सोनसळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर गणेश मुंडे

औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर गणेश मुंडे

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर गणेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ. वसंत सातपुते, आयोजक डाॅ. मुकुंदराज पाटील हे उपस्थीत होते.वनस्पतीशास्त्र विभागाने आयोजीत केलेल्या या प्रदर्शनामध्ये परिसरातील जवळपास पासष्ट औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांकडुन सांगण्यात आली.या प्रदर्शनाला सोनपेठ तालुक्यातील ७५०ते ८०० अभ्यागतांनी भेट दिली. यात  जि. प. शाळा, दहीखेड, मुक्तेश्वर विद्यालय सोनपेठ, एल.आर. के. स्कूल, सोनपेठ, डॉ. झाकीर हुसेन ऊर्दु हायस्कूल सोनपेठ, जि. प. शाळा,वाणीसंगम ई. शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरीक, पत्रकार आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.

Wednesday, February 26, 2020

व्हिजन पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

व्हिजन पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल व विश्वभारती प्रायमरी स्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे आकर्षण मराठी सिने अभिनेत्री केतकी लांडे व हरिभाऊ कदम (महाराष्ट्र प्रसीध्द फेम संबळ वादक) ठरले, प्रमुख पाहुणे भारत राठोड ( मुख्य कार्यकारी अधिकारी उदगीर), राजेश विटेकर (माजी.जि.प. अध्यक्ष,परभणी),नामदेव पवार, संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार मॅडम, सचिव विनोद पवार सर, संस्थेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे सर, उपप्राचार्य भगवान घाटुळ सर, रामेश्वर हुंबे सर (मुख्याध्यापक विश्वभारती प्रायमरी स्कूल) कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.दुकळे सर यांनी केली. तसेच प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच केतकी लांडे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व हरिभाऊ कदम यांनी आपल्या संबळची जादू सर्वांना प्रत्यक्षात दाखवून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, पोवाडा, हिंदी गाणे, मराठी गाणे, देशभक्ती गाणे, सादरीकरण केले. या बाल चिमुकल्यांच्या नृत्याचा सर्वांनी आनंदी  घेतला. शेवटी आभार प्रदर्शन सारिका पवार मॅडम यांनी केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची शेख बुशरा गो गर्ल स्पर्धेत तालुक्यात द्वितीय

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची शेख बुशरा गो गर्ल स्पर्धेत तालुक्यात द्वितीय 


सोनपेठ (दर्शन):- 

सोनपेठ तालुकास्तरीय केवळ मुलींसाठी खडका येथे गो गर्ल ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या वतिने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची शेख बुशरा एजाज ही वर्ग 7 वी अ ची मुलगी या स्पर्धेत 100 मीटर धावणे तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले .तिला मार्गदर्शन रविकुमार स्वामी यांनी केले.तिच्या या यशामुळे तिचे गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण, केंद्रप्रमुख गणपत कोटलवार, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी तसेच उपाध्यक्ष व सर्व सदस्य सदस्य आदीसह पालक वर्गातून शेख बुशरा एजाज हिचे अभिनंदन तसेच पुढील कार्यास शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Tuesday, February 25, 2020

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त औषधी वनस्पतीचे प्रदर्शन व राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन वनस्पती विषयक प्रश्नोत्तरे स्पर्धा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त औषधी वनस्पतीचे प्रदर्शन व राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन वनस्पती विषयक प्रश्नोत्तरे स्पर्धा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून औषधी वनस्पतीचे प्रदर्शन व राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन वनस्पती विषयक प्रश्नोत्तरे स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजीत केले आहेत.शहरातील कै.र.व.महाविद्यालयात दि. 27 फेब्रुवारी रोजी औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरवण्यात भरवण्यात येणार आहे. तरी परीसरातील सर्व विद्यार्थी व नागरीकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे अवाहन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकुंदराज पाटील व प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले आहे.तसेच दि. 28 फेब्रुवारी ला ऑनलाइन बॉटनी क्वीझचे आयोजन करण्यात आलेले असुन देशभरातुन सुमारे 400 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदनी केल्याचे या क्वीझ चे समन्वयक डॉ.मुकुंदराज पाटील व प्रा. विशाल राठोड यांनी सांगितले.

Monday, February 24, 2020

शेतकऱ्याचे आयुष्य ‘इझी गोईंग’ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न - मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे • महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद • जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी साधला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याशी दिलखुलास संवाद

शेतकऱ्याचे आयुष्य ‘इझी गोईंग’ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न - मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे 
• महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
• जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी साधला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याशी दिलखुलास संवाद 
 


       
परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करुन कर्जमुक्ती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य ‘इझी गोईंग’ कसे होईल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तरी अधिकाऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्याला न दुखावता आनंदाने व प्रामाणिकपणे योजनेची कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील पिंगळी व गिरगाव (ब्रु) येथील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदि उपस्थित होते.
 पुढे बोलतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची कामे सुरळीतपणे पहिल्याच दिवशी सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांशी समजुतदारपणे वागून पुर्णत: सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील रहिवाशी असलेले शेतकरी विठ्ठल रुस्तुमराव गरुड यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले 1 लाख 15 हजार 875 रुपये कर्जमाफ झाल्याबद्दल संवाद साधला. यावेळी श्री. गरुड यांनी कर्जमाफीचा लाभ घेत असतांना खुप सहजपणे लाभ मिळाला, कुठलीही किचकट प्रक्रिया पहावयास मिळाली नाही तसेच बँक व्यवस्थापक श्री.शिराळे यांनी खुप सहकार्य केल्याची भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री.ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना आपल्या मुलींच्या लग्नांचे निमंत्रण देवून शासनाने प्रत्यक्ष कर्जमाफी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रमाणे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला.
 यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी श्री.गरुड यांच्याशी संवाद साधून कर्जमाफीचा लाभ मिळताना त्रास झाला का, जमीन किती आहे असे प्रश्न विचारुन शेतकरी आनंदात रहावा त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण, घर, लग्न, प्रपंच व्यवस्थित पार पाडावा यासाठी शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच परभणी तालु क्यातील पिंगळी येथील बाबाराव शंकरराव दामोदर यांचे 1 लाख 8 हजार 271 रुपयांचे कर्जमाफ झाल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. आणि कर्जमाफी घेताना कुठलीही अडचण आली नाही व खुप कमी वेळेत मला कर्जमाफीचा लाभ मिळाला असून या कामात खुपच तत्परता दिसून आल्याचे अनुभवाचे बोल त्यांनी यावेळी सांगितले. 
 नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घोषणा करुन मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाभ वितरणाची कार्यवाही केवळ 60 दिवसात सुरु करण्यात आली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिली. तर उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये हाच कर्जमाफी देतानाचा उद्देश असून बळीराजा कर्जमुक्त व्हावा व त्यांने संसार सुखात व आनंदात करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या व्हिडीओ कॉन्फरन्सला महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेले लाभार्थी शेतकरी व संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
-*-*-*-*-

Sunday, February 23, 2020

केंद्रीय कन्या शाळेत स्नेह संमेलनातुन श्रि गणेशा, बालगीत, देश भक्तीपर, भारुड, लावणी, छत्रपती शिवाजी महाराज प्रसंग सादरीकरण दर्दी लोकांची गर्दी

केंद्रीय कन्या शाळेत स्नेह संमेलनातुन श्रि गणेशा, बालगीत, देश भक्तीपर, भारुड, लावणी, छत्रपती शिवाजी महाराज प्रसंग सादरीकरण दर्दी लोकांची गर्दी












सोनपेठ (दर्शन) :-

शहरातील कन्या शाळेत शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.स्नेहसंमेलनाच्या उदघाटक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर या होत्या तर अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जिजाबाई राठोड तर प्रमुख उपस्थितीत येथील गटविकास अधिकारी सचिन खुडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पाटील, भगवान राठोड,राजेश खेडकर,सुभाष सुरवसे,गोविंद नाईक,सुकेश यादव,गणपत कोटलवार,मुख्याध्यापक किशन रत्नपारखे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांना अशा कार्यक्रमातुन व्यासपीठ उपलब्ध होत असते.आणि यामुळेच यांच्यातील कलाकार आपणांस दिसुन येत असतो.भविष्यात दिसणारे वेगवेगळे कलाकार अशाच स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांतून घडणार असतात.त्यामुळे शाळेत होत असलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. उपस्थित पालकांसह नागरिकांना बाल कलाकारांच्या भुमिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांनी अवाक केले होते.छत्रपती शिवाजी महाराजांसह देशाच्या संरक्षणासाठी सतत पहारा देत असलेल्या सैनिकावरील सादरीकरणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड यांनी केले.तर सुत्रसंचालन परमेश्वर शिंदे यांनी तर आभार रामेश्वर राऊत यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कन्या शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती.

मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा वडवणीत ; तालुका अध्यक्षपदी विनायक जाधव

मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा वडवणीत ; तालुका अध्यक्षपदी विनायक जाधव


वडवणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, राज्य अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या सूचनेवरून व राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वडवणी तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा स्थापन करून तालुका अध्यक्षपदी विनायक जाधव, तालुका उपाध्यक्षपदी सुधाकर शिंदे, तालुका सरचिटणीसपदी सतीश सोनवणे, तालुका कार्याध्यक्षपदी अशोक निपटे, तालुका कोषाध्यक्षपदी शांतिनाथ जैन यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे उल्लेखनीय कार्य मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारी मराठी पत्रकार परिषद. महाराष्ट्र राज्यात असून वडवणी तालुक्यात परिषदेची एक शाखा व्हावी म्हणून मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडे अनिल वाघमारे यांनी संकल्पना मांडली होती.त्यांनी होकार दिल्यानंतर राज्याचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे यांच्याशी संपर्क करून वडवणी येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी विनायक जाधव,उपाध्यक्षपदी सुधाकर शिंदे, सरचिटणीसपदी सतीश सोनवणे, कार्याध्यक्षपदी अशोक निपटे तर कोषाध्यक्षपदी शांतिनाथ जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. व आगामी काळातील परिषदेचे ध्येयधोरणे यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मावळते तालुका अध्यक्ष सुधाकर पोटभरे,पत्रकार हरी पवार, पत्रकार ओमप्रकाश साबळे, पत्रकार सुर्यकांत सावंत, पत्रकार आकाश पोटभरे, पत्रकार अनिल काळे, पत्रकार ओम जाधव, पत्रकार हनुमंत मात्रे, पत्रकार भागवत सावंत आदींची उपस्थिती होती.

परभणी जिल्हा शासकीय पुनरनियुक्त माजी सैनिक संघटना कार्यकारणी निवड ; सहसचिव - श्री गोविंद राठोड

परभणी जिल्हा शासकीय पुनरनियुक्त माजी सैनिक संघटना कार्यकारणी निवड ; सहसचिव - श्री गोविंद राठोड 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथे शासकीय पूनरनियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालय औरंगाबाद यांचे वतीने दि.23 फेब्रुवारी 2020 रविवार रोजी परभणी जिल्हा शासकीय पुनरनियुक्त माजी सैनिक संघटना कार्यकारणी निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष- श्री गणपत संसारे,  उपाध्यक्ष - श्री अंतराम मुंडे, सचिव- अजिज खान, कोषाध्यक्ष- शरद यादव, सहसचिव - श्री गोविंद राठोड ,सदस्य श्री संजय पाटील, गंगाधर फुटाणे, राघू तालडे, जयवंत भुमरे ,आनेराव  एम.जे.व इतर सदस्य उपस्थित होते. सदर कार्यकारीणी निवडीसाठी मराठवाडा विभागीय प्रमुख तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री हयुन  पठाण साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर श्री प्रकाश कुलकर्णी सचिव औरंगाबाद महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना,तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री कमलाकर शेटे मुख्य सल्लागार महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थिती चंद्रकांत महाजन उपाध्यक्ष नांदेड जिल्हा यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 

Saturday, February 22, 2020

सोनपेठ सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष निर्मळे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

सोनपेठ सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष निर्मळे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संतोष निर्मळे तर व्हा.चेअरमन पदी गजानन देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. 
जानेवारी महिन्यामध्ये सेवा सोसायटीच्या १३ सदस्य संख्या असलेल्या संचालक पदासाठी पंचवार्षीक निवडणुका घेण्यात आल्या.
माजी आ.व्यंकटराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका बिनविरोध पार पडल्या.
चेअरमन पदाच्या निवडी साठी दि. १८ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ए. के. कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली,या विशेष सभेत चेअरमन पदी संतोष निर्मळे यांची तिसऱ्याचा बिनविरोध निवड झाली तर व्हा.चेअरमन पदी गजानन देशमुख यांची निवड झाली आहे.
 या विशेष सभेला संचालक व्यंकटराव कदम, गोपाळ सारडा, सतीश देशमुख, जितेंद्र वडकर, रामभाऊ भंडारे, वैजनाथ नरहिरे, बालूदेव लोंढे, अंबादास आवाड, ताराचंद बेदमुथा, मंजुबाई शर्मा, संगीता अंभोरे उपस्थित होते.
 सहाय्यक निवडणूक  निर्णय अधिकारी म्हणून संस्था सचिव अमोल पांडे यांनी काम पाहिले, तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष निर्मळे यांची चेअरमनपदी  हॅट्रिक झाल्यामुळे त्यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

Friday, February 21, 2020

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यास आज आपलाही सहभाग नोंदवा - शा.व्य.स.अध्यक्ष किरण स्वामी.

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यास आज आपलाही सहभाग नोंदवा - शा.व्य.स.अध्यक्ष किरण स्वामी.



सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज दिनांक 22 फेब्रुवारी 2020 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हा परिषद परभणी अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा सौ.जिजाबाई राठोड प्रमुख पाहुणे पंचायत समिती सभापती सौ.मीराताई जाधव, गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आदिजन असून या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपणही सहभाग नोंदवून शोभा वाढवावी असे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी तसेच उपाध्यक्षा सर्व सदस्य, सदस्या तसेच मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले आहे.