मुलभूत अधिकारांबरोबरच मुलभूत कर्तव्यातही दक्ष रहावे - न्या.एस.एस. खिरापते
मराठी भाषा टिकली - वाढली तरच मराठी माणूस टिकेल - प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर
राजीव गांधी महाविद्यालयात पत्रकार सन्मान
सोनपेठ (दर्शन) :-
राज्यघटनेने नागरीकांना मुलभूत अधिकार प्रदान केले आहेत. लोक कल्याणकारी धोरणांनी हे अधिकार मिळालेले आहेत. मात्र ज्या प्रमाणात मुलभूत अधिकारांबाबत आपण दक्ष असतो त्याप्रमाणात राज्यघटनेने नागरीकांना मुलभूत कर्तव्ये दिली आहेत त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मुलभूत अधिकारांबरोबरच मुलभूत कर्तव्यातही दक्ष रहावे असे प्रतिपादन सत्र न्यायालयाचे न्या.एस.एस.खिरापते यांनी केले. तर मराठी ही आपली मातृभाषा असून जगात स्वप्न असो की येणारे नवनवीन विचार, कल्पना हे प्रथम मातृभाषेतच येते त्यामुळे मराठी भाषा टिकली - वाढली तरच मराठी माणूस टिकेल असे मत प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर यांनी मांडले.
सोनपेठ येथील राजीव गांधी महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभ संपन्न झाला. या समारंभाला सोनपेठ न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. खिरापते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर, सहाय्यक शासकीय अभियोक्ता बी.एस. लोमटे, नागरी बँक सोनपेठ चे अध्यक्ष रमाकांत जहागीरदार, वकील संघाचे अध्यक्ष अॕड. डी. आर. मोकाशे , कै.राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था खडका चे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, अॕड. अशोक तिरमले, प्र. प्राचार्य बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती, संत ज्ञानेश्वर महाराज, बाळशास्त्री जांभेकर ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी अॕड.राठोड यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक शासकीय अभियोक्ता बी.एस. लोमटे, वकील संघाचे अध्यक्ष अॕड. डी. आर. मोकाशे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश एस. एस. खिरापते यांनी कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर यांनी 'मराठी भाषा संवर्धनात वृत्तपत्रांचे योगदान' या विषयावर सविस्तरपणे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या समारंभात मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेत सक्रियपणे काम करुन योगदान देणाऱ्या पत्रकार बांधवांचा राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देउन सन्मानित करण्यात आले.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. सी. बी. किरवले यांनी केले. कार्यक्रमाला अॕड. धबडे, तालुका विधी सेवा समितीचे कार्याध्यक्ष अंभोरे, यांच्यासह माणिकअप्पा निलंगे, प्रा. सुमेध कांबळे, प्रा. नर्गिस शेख, प्रा. रेखा कांबळे, प्रा. दिक्षा सिरसाट, श्वेता चौहान, कैलाश भालेराव, बाळू भारती आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment