अभिनव उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार
सामाजिक समता अंतर्गत विविध कार्यक्रम; सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांची माहिती
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 6 ते 16 एप्रिल दरम्यान सामाजिक समता या उपक्रमाअंतर्गत अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी दिली आहे.
6 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाची रूपरेषा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांचे हस्ते प्रसिद्ध करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 7 एप्रिल रोजी समाजकल्याण विभागाची सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. 8 एप्रिल रोजी जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावा घेण्यात येणार आहे. 10 एप्रिल रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन केले जाणार आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. 12 एप्रिल रोजी मार्जिनमनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 14 एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकर्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले आहे. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित केले जाणार आहे. 15 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावा आयोजित केला आहे. याशिवाय तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 16 एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे हा उपक्रम राबविण्यात येऊन सामाजिक समता कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अभिवन उपक्रमात सर्वांनी सहभागी हावे असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment