Tuesday, July 13, 2021

जिल्हाधिकाऱ्यांचे पिक विमा संदर्भात आवाहन ;शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तक्रार नोंदवावी

जिल्हाधिकाऱ्यांचे पिक विमा संदर्भात आवाहन ;शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तक्रार नोंदवावी


परभणी / सोनपेठ (दर्शन):- 
प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे.  शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यास सुरुवात केली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दि.15 जुलै 2021 ही आहे.  रविवार दि.11 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा पिक विमा काढलेला असून त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा संबंधितांनी गुगल प्ले स्टोअरवरुन ‘क्रॉप इन्शुरन्स’ हे ॲप डाऊनलोड करावे व त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड करावी किंवा 18001024088 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
            ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची नोंद करणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे झाले असल्याने अतिवृष्टी हेच कारण नमुद करुन नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नुकत्याच पेरण्या होवून काही पिकांची उगवण सुरु असून काही ठिकाणी पिक वाढीच्या अवस्थेत आहेत हे लक्षात घेवून स्थानिक आपत्ती अंतर्गत जोखमीचा धोका घडेपर्यंत पिक विमा काढलेल्या पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठांच्या खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित क्षेत्राच्या अधिन राहून मंजूर करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवतांना योग्य ती खबरदारी घेवूनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment